आटपा हो झडकरी!
हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात गडकरी वाकबगार आहेत.त्यांनी राज्य सरकारला वृक्षारोपणाबाबत काही सूचना केल्यात,त्यावर त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा तसेच बांबूची संरक्षक भिंत अपघात टाळण्यासाठी उभारण्यात यावी, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचविण्यात आले असून त्याची अंमलबजावणी कधी होते हे महत्त्वाचे आहे. गडकरी हायवेचे काम 'झडकरी ' पूर्ण करतील अशी अपेक्षा वाटते ती फोल ठरू नये.
मुंबई- गोवा महामार्गाचे काम या वर्षअखेरीस पुर्ण होऊन पुढील वर्षी जानेवारीत तो वाहतूकीसाठी पुर्णपणे खुला होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच दिल्याने त्यावर भरवसा ठेवण्यास अडचण नाही असे म्हणण्यास हरकत नाही कारण समस्येच्या तळाशी जाऊन काम करण्याची पद्धत व कामाचा उरक वेळेत व्हावा यासाठी धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता असलेले मंत्री म्हणून गडकरींची देशभर ख्याती असून याबरोबरच अपयश स्वीकारण्याची तयारीदेखील ठेवलेली असल्याने विरोधक त्यांच्यावर फार टीका करण्याचे टाळतात.रामनवमीच्या दिवशी मुंबई- गोवा महामार्गाची हवाई पाहणी करण्याबरोबरच सुमारे 15 हजार कोटींच्या तीन नव्या प्रकल्पांची घोषणा त्यांनी केली असून पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांचा विचार करता सर्व कामे वेगाने सुरू करण्याबरोबरच शक्य तेवढ्या कमी वेळात उरक करण्यावर भर असणार हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.मुंबई-गोवा महामार्गाचे मागील 13 वर्षे भिजत घोंगडे पडलेले असून त्याची अनेक कारणे आहेत. जानेवारी 2010 ते एप्रिल 2021 या कालावधीत 2442 जणांनी विविध अपघातात या महामार्गावर जीव गमावले तर त्याहून कितीतरी अधिक संख्येने जायबंदी झालेले आहेत.या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 11,500 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.मात्र प्रत्यक्षात कामाला वेग नाही आणि ढिसाळ नियोजन यामुळे कोकणवासियांची परवड काही संपली नाही.त्यामुळे आंदोलन व उपोषणे सुरू झाली.यातूनच मग मुंबई- गोवा हायवे ध्येयपुर्ती समिती गठित झाली.बिगर राजकीय असलेली ही समिती आहे. त्याशिवाय हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात 2018 पासून गेला असून जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान डिसेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण होईल असा शब्द आपल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने दिला होता. आता गडकरी यांनीच लक्ष घातल्यामुळे कामाला गती येईल पण त्याचवेळेस बांधकाम झालेल्या रस्त्याला खड्डे पडणार नाहीत आणि सण उत्सव काळात वाहतूक वाढल्यावर प्रवास रेंगाळणार नाही याची दक्षता घेतली जाणे महत्त्वाचे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा